
अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जामखेडमध्ये सिटी केअर सेंटर आणि सिटी केअर फार्मसीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांनी त्यांना राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारले. यावेळी जिल्हा बँकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर राम शिंदे यांनी १५ सप्टेंबरनंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा सातत्याने होत असते. दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमांपासून दूर राहिल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
मात्र, भाजपात गटबाजी नसल्याचा राम शिंदेंचा दावा आणि १५ सप्टेंबरनंतरची भूमिका यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे.





