
अहिल्यानगरकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीला आता ब्रेक लागणार आहे. कारण की, डीएसपी चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
तब्बल ५४० मीटर लांबीचा आणि चारपदरी हा उड्डाणपूल सुमारे ४५ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चातून उभारला जाणार आहे.
ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असून, अवघ्या १८ महिन्यांत पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या नटराज चौक परिसरात माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर ईपीसी डिझाइन तयार करून बांधकाम विभागाची मंजुरी घेतली जाणार आहे.
दररोज ३५ हजारांहून अधिक वाहने डीएसपी चौकातून जातात. नगर-मनमाड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरकडील वाहतूक एकाच ठिकाणी येत असल्याने येथे वारंवार कोंडी होते.
हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर बाहेरगावी जाणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाचण्यासोबतच चौकातील वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.





