
कोपरगावच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मंडळी, नियोजित नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.
चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर आणि धोंडेवाडी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जमिनीचे अधिकृत अधिग्रहण होईपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना आपल्या हरकती नोंदवण्याची संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाला सुरुवात झाली आहे. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यामुळे त्रस्त नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या रस्त्यासाठी आणखी मोठ्या निधीची मागणी करण्यात आली असून, ती लवकर मंजूर होईल, असा विश्वास आमदार काळे यांनी व्यक्त केला आहे.





