
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत ३०१.१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना २५४ मिलिमीटर नोंद झाली आहे. म्हणजे सरासरी ८४ टक्के पाऊस झाला असला, तरी तो सर्वदूर आणि दमदार नसल्याने खरीप पिकांना अपेक्षित फायदा मिळालेला नाही.
राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा या पाच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी अवघे ४९ टक्क्यांच्या आसपास राहिले आहे.
राहुरीची परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून, येथे केवळ ३५.९ टक्के पाऊस झाला आहे. श्रीरामपूरमध्ये ४७.७, शेवगाव ५१.४, पाथर्डी ५३.४ आणि नेवासा येथे ५२.४ टक्के पावसाची नोंद झाली.
ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक ठिकाणी खरीप पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाऱ्याची टंचाई वाढल्याने दरही भडकले आहेत.
सप्टेंबरमध्ये १४५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. मात्र पहिला आठवडा कोरडा गेल्याने आता शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत.





