
डिंभे-माणिकडोह बोगद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे, असा स्पष्ट दावा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मात्र, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बोगद्याबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. यामुळे प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती.
यावर विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत, बोगद्याला मंजुरी मिळालेली असून वळसे पाटील यांच्या आक्षेपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होऊन हे आक्षेप दूर केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकल्पासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, साखळाई उपसा जलसिंचन योजनेला घोड नदीतून पाणी मिळणार असून डिंभे-माणिकडोह बोगद्यामुळे साखळाई योजनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





