
बापरे ! अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात गुटखा, सुगंधित सुपारी आणि पानमसाल्याचे मोठे जाळे कार्यरत असल्याची चर्चा आहे.
मंडळी, गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शेजारच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर माल अहिल्यानगरमध्ये दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा गुटखा केवळ शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पोहोचवला जात आहे.
माहितीनुसार, नाशिकमधून संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता आणि शिर्डी भागात पुरवठा केला जातो. तर छत्रपती संभाजीनगरकडून नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव आणि पाथर्डी भागात गुटखा पोहोचतो. सोलापूरमार्गे कर्जत, जामखेड आणि नगर परिसरात, तर पुणेमार्गे श्रीगोंदा आणि पारनेर भागात हा माल आणला जात असल्याचे सांगितले जात आहे.
या तस्करीची पद्धतही अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे बोलले जाते. ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पांढऱ्या गोणपाटांमध्ये माल जिल्ह्यात आणला जातो. त्यानंतर महागड्या चारचाकी वाहनांमधून तो विविध एजंटांपर्यंत पोहोचवला जातो. पुढे हे एजंट गावागावातील टपऱ्या आणि किरकोळ विक्रेत्यांकडे माल पोहोचवतात.
मंडळी, केवळ तस्करांवरच नव्हे, तर या रॅकेटला संरक्षण कोण देत आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.





