
शेवगाव नगरपरिषदेत नेमकं चाललंय तरी काय? सत्तेच्या खुर्चीभोवती सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात धडक दिली आहे!
मंडळी, नगराध्यक्षा मायाताई अरुण मुंढे यांचे पती अरुण मुंढे यांच्या नगरपरिषद कारभारातील हस्तक्षेपाविरोधात १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. फाईल घरी मागवणे आणि नगराध्यक्षांच्या दालनाचा गैरवापर केल्याचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांना दिले.
मात्र, त्यानंतर नगराध्यक्षा मायाताई मुंढे यांनीही नगरसेवकांविरोधात गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजपचे काही नगरसेवक एकत्र येऊन दबाव टाकत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तसेच महिला नगरसेविकांच्या पतींकडून आर्थिक लाभासाठी दबाव आणि धमक्यांचे आरोपही त्यांनी केले. उपनगराध्यक्ष सिराजभाई पटेल यांचे पुत्र ताहेरभाई पटेल यांच्याविरोधातही त्यांनी तक्रार केली आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे शेवगावकरांचे लक्ष लागले आहे.





