
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याचं लिंबामुळे आता श्रीगोंद्याच्या शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.
मंडळी सध्या येथील लिंबाला घाऊक बाजारात तब्बल १३० ते १५० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमतही ७ ते १० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत असलेल्या लिंबू उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
अवकाळी पाऊस आणि कँकर, डिंक्या रोगामुळे मागील वर्षी अनेक बागांचे नुकसान झाले. परिणामी बाजारातील आवक तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला.
मात्र शेतकऱ्यांसमोर अजूनही बनावट औषधे, खतांची समस्या, मजुरांची टंचाई आणि कोल्ड स्टोरेजचा अभाव अशी आव्हाने आहेत.
लिंबावर प्रक्रिया उद्योग आणि निर्यातीच्या सुविधा उपलब्ध झाल्यास श्रीगोंद्याची ओळख आणखी मजबूत होऊ शकते. आता शेतकऱ्यांची मागणी आहे—‘श्रीगोंद्याच्या लिंबाला’ जीआय टॅग कधी मिळणार?





