Explained

Explained : Shivajirao Kardile | दूधवाला शिवा ते आमदार शिवाजीराव… सगळं एकाएकी झालं नव्हतं…

दुग्धव्यावसायिक ते मंत्री असा स्वप्नवत प्रवास पाहिलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक मुरब्बी राजकारणी हरपला. नगरच्या राजकारणात गेल्या 3 तपांपासून ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, त्या शिवाजीराव कर्डिलेंचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. अगदी अपघाताने राजकारणात आलेले शिवाजीराव कर्डिलेंचा प्रवास नेमका कसा होता, हेच आपण आज पाहणार आहोत.,,

शिवाजीराव कर्डिले हे मुळचे बुऱ्हानगरचे. नगर शहराच्या जवळचं हे खेडं. याच बुऱ्हानगर येथे 1958 साली त्यांचा जन्म झाला. तरुण वयात बुऱ्हानगरचे अनेक तरुण शेतकरी नगर शहरात दूध विक्रीसाठी आणत. शिवाजीरावही त्यातलेच. या दुधविक्रीतून त्यांची नगरच्या अधिकाऱ्यांशी, राजकारण्यांशी चांगली मैत्री होती. याच मैत्रीतून शिवाजीराव त्यांच्या गावातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवू लागले. रोज नगरला येणं-जाणं असल्यानं, जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या आपल्या सगळ्यात ओळखीच्या लोकांचे काम शिवाजीरावांकडून होऊ लागले. राजकीय पदाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, नगरचे प्रतिष्ठीत व्यापारी या सगळ्यांकडेच शिवाजीरावांचे रतीबाचे दूध असल्याने फक्त शिवाजीरावांच्या एका भेटीत सगळ्यांची कामे होत होती. नगर शहरातील शिवाजीरावांच्या याच ओळखीचा गावात चांगलाच रुबाब वाढला.

1984 साली त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. तोपर्यंत शिवाजीरावांना राजकारणाचा कोणताच गंध नव्हता. राजकारण करायचेही नव्हते. परंतु 1984 च्या बुऱ्हानगर ग्रामपंचायतीसाठी सर्व नऊ सदस्य बिनविरोध करायचे, गावकऱ्यांनी ठरवले. शिवाजीरावांनाही फाँर्म भरण्याचा आग्रह केला. परंतु मला ते जमणार नाही. राजकारण करताच येणार नाही, म्हणत शिवाजीरावांनी फाँर्म भरायला त्यावेळी नकार दिला. अखेर गावातीलच त्यांच्या मित्रांनी आग्रह केला आणि त्यांना फाँर्म भरायला लावला. शिवाजीराव बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झाले आणि लगेच बिनविरोध सरपंचही झाले. ध्यानीमनी नसताना हे सगळं घडलं. सरपंचपदाची निवड झाली आणि लगेच शिवाजीरावांनी सगळ्या सदस्यांना गावातील मारुतीच्या मंदीरात नेलं. तेथे मारुतीसमोर गट-तट विसरुन गावाचा विकास करायचा असेल तर मी सरपंच राहतो, अशी शपथ घ्यायला लावली. झालं… तेथूनच बुऱ्हानगरच रुपही बदललं. त्यानंतर पुढच्या दोन टर्मही तेच गावचे सरपंच राहिले.

त्यांचे जिल्हापातळीवरील राजकारणाची स्टोरीही तेवढीच इंटरेस्टींग होती. 1994 मध्ये शिवाजीरावांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या विरोधात तेव्हाचे बडे प्रस्त असणाऱ्या दादा पाटील शेळके यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. शिवाजीरावांच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यानंतर पुढच्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका लागल्या. तोपर्यंत दादा पाटील शेळके हे खासदार झाले होते. त्यांच्या जागी काँग्रेसने विजया कुटे यांना तिकीट दिलं. विजया कुटे यांना काँग्रेसमधूनच विरोध होता. परंतु तिकीट फायनल झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला. हिच संधी साधून सर्व पक्षियांनी शिवाजीराव कर्डिले यांना नगर-नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घातली. शिवाजीराव कर्डिले यांनी अपक्ष अर्ज भरला.

त्यावेळी नगर-नेवासा मतदारसंघात यशवंतराव गडाख हे मोठं प्रस्त होतं. यशवंतरावांनाही विजया कुटे यांची उमेदवारी मान्य नसल्यानं त्यांनी अपक्ष उभे राहिलेल्या शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात आपली यंत्रणा उतरवली. गडाखांनी मदत केल्यामुळे शिवाजीराव कर्डिले आमदार झाले. तेथेच खऱ्या अर्थाने दूध विक्रेत्या शिवा चा, थेट शिवाजीराव झाला… त्यानंतर 1999, 2004, 2009 असे सलग चार टर्म त्यांनी कुणालाच जमू दिले नाही. आघाडी सरकारच्या काळात 2002 ते 2004 अशी दोन वर्षे त्यांनी बंदरे व मत्सविकास मंत्रीपदही सांभाळले. जुलै 2004 ते ऑक्टोंबर 2004 या काळात जलसंधारण, वने महिला व बालविकास खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कारभारही सांभाळला. त्यानंतर 2014 साली तर त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुरीला आले होते. मोदींनी शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी घेतलेली सभा चांगलीच गाजली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते कायम आमदार राहिले. 2024 च्या निवडणुकीतही त्यांनी माजीमंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा दणदणीत पराभव केला होता. सहा वेळा आमदार राहिलेल्या शिवाजीरावांना यावेळी भाजपकडून मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती अपूर्णच राहिली. शेवटच्या अडीच वर्षात तरी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. सर्वपक्षियांचा नेता, 24 तास कामात असणारा राजकारणी अशी त्यांची ओळख होती. कर्डिलेंनी स्वतःचेच नाही, तर आपल्या जावयांचेही राजकारण सेट करुन देण्यात पुढाकार घेतला होता. नगर महानगर पालिकेत त्यांच्या तिनही मुली नगरसेविका राहिल्या होत्या. त्यांचे एक जावई संग्राम जगताप हे नगरचे गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. कोतकर, गाढे कुटुंबाचाही शिवाजीराव चांगलाच आधार होते.

सहा वेळा आमदार, तीन वेळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, मंत्री राहिलेल्या शिवाजीराव कर्डिलेना अहिल्यानगर लाईव्ह 24 कडून मानाचा मुजरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button