
श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी येथे गावातील भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला हा प्रयत्न चांगलाच महागात पडला. १० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
पोलिस तक्रारीनुसार, गावात भांडण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मच्छिंद्र साहेबराव चोर हे पत्नी आणि मुलासह घटनास्थळी गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्यांचा वापर करून हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
भांडण थांबवण्यासाठी पत्नी आणि मुलगा मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे. आरडाओरड ऐकून मदतीला आलेल्या इतर नातेवाईकांनाही लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





