
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा टप्पा-२ च्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत निवडक गावांतील पात्र शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संचासाठीचे अनुदान खरेदीपूर्वीच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना आधी संपूर्ण रक्कम खर्च करून सिंचन संच खरेदी करावा लागत होता. त्यानंतर अनुदान खात्यात जमा होत असे. मात्र, नव्या पद्धतीमुळे सुरुवातीचा आर्थिक ताण कमी होणार आहे.
मंजूर अनुदान डिजिटल स्वरूपात मोबाइलशी जोडलेल्या वॉलेट किंवा ॲपमध्ये टोकन अथवा व्हाउचरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हे टोकन अधिकृत पुरवठादाराकडे वापरून सिंचन संच घेता येईल.
अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. निवडक गावांतील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसह एससी, एसटी आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जासाठी dbt.mahapocra.gov.in पोर्टल किंवा DBT-PoCra ॲपचा वापर करता येईल.





