
शिर्डी आणि संगमनेरपाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एका तालुक्याच्या शहराला भव्य बसस्थानकाची भेट मिळणार आहे. मंडळी अनेक वर्षांपासून जुन्या इमारतीत सुरू असलेल्या श्रीरामपूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला अखेर सुरुवात झाली आहे. शासनाने बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ९ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
शिर्डी आणि संगमनेरच्या धर्तीवर श्रीरामपुरात अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याचे नियोजन आहे. श्रीरामपूर हे शिर्डी, शिंगणापूर, नेवासा, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, वैजापूर आणि मराठवाड्याला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते.
नव्या बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, या जागेसाठी १९५८ मध्ये १.४५ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. १९६४-६५ मध्ये येथे कायमस्वरूपी बसस्थानक उभारण्यात आले. मात्र, काळानुसार इमारत जुनी झाली.
आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.





