
धीरज परदेसी हत्याकांडानंतर सुरू झालेल्या कामबंद आंदोलनाचा फटका थेट नागरिकांना बसला का? आता या गंभीर तक्रारीची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने दखल घेतली आहे!
मंडळी, अहिल्यानगरमध्ये धीरज परदेसी यांच्या हत्येच्या निषेधार्थ महानगरपालिका कर्मचारी युनियनने कामबंद आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनामुळे मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गादायरा परिसरातील पाणीपुरवठा, कचरा संकलन, स्वच्छता, पथदिवे आणि आरोग्यसेवा बाधित झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला.
आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्याचा फटका निरपराध नागरिकांना बसू नये, अशी भूमिका शाकीर शेख यांनी मांडली. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवांपासून वंचित ठेवण्यात आलं का, पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित जबाबदार व्यक्ती कोण आणि प्रशासनाकडून काय व्यवस्था करण्यात आली, याचा अहवाल आता सादर केला जाणार आहे.





