
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात तब्बल ३८ दिवसांनंतर अखेर हलक्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारी झालेल्या सरींमुळे पावसाअभावी अडचणीत आलेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
हवामान विभागाने १२ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने मोठी दडी मारली.
यंदा अकोले तालुक्यात सर्वाधिक, तर राहुरीत सर्वात कमी पाऊस झाला आहे. श्रीरामपूरमध्ये ५०.५, राहात्यात ६३.९ आणि राहुरीत ६५.६ टक्के पावसाची नोंद झाली.
प्रशांत महासागरातील वातावरणीय बदल आणि मान्सूनचे वारे मध्य भारतात स्थिरावल्याने पावसाचा खंड पडल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.





