
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आक्षेप समजून घेत, सरकार चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला सरकारचा विरोध नसून, मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, असेही पाचपुते यांनी सांगितले.
मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर करू नका, असा इशारा त्यांनी दिला. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करणे योग्य असले, तरी आंदोलनाला तात्काळ राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे पाचपुते म्हणाले.
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी हा स्वायत्त आयोग असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून होते. त्यामुळे सरकारला थेट राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई होईल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे हा संबंधितांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





