घर खरेदीचं स्वप्न आता आणखी महाग होणार आहे का? कारण गेल्या ५ वर्षांत घरांच्या किमती तब्बल ५९ टक्क्यांनी वाढल्या आहेत!
ANAROCKच्या अहवालानुसार, २०२१ ते २०२५ या काळात देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घर बांधण्याचा सरासरी खर्च ३४ टक्क्यांनी वाढला. प्रति चौरस फूट बांधकाम खर्च २,६८१ रुपयांवरून ३,६०४ रुपयांपर्यंत पोहोचला.
मात्र घरांच्या विक्री किमतीची वाढ यापेक्षा खूपच जास्त आहे. सरासरी निवासी मालमत्तेची किंमत ५,८२६ रुपयांवरून तब्बल ९,२६० रुपये प्रति चौरस फूट झाली. मग एवढी वाढ नेमकी कशामुळे?
तर, अहवालानुसार, जमिनीच्या वाढत्या किमती, लोकेशन, पायाभूत सुविधा, मागणी-पुरवठा आणि डेव्हलपर्सची किंमत ठरवण्याची रणनीती यांचा मोठा वाटा आहे.
विशेष म्हणजे, अनेक प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किमती ५० ते १२० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. म्हणजेच घर महागण्यामागे फक्त विटा-सिमेंट नाही, तर जमीन हा सर्वात मोठा घटक ठरत आहे!





