
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी रोखणारे खरे खलनायक कोण? रोहित पवारांनी पुराव्यांसह थेट नाव घेत मोठा धमाका केलाय. रोहित पवारांनी केलेलं ट्विट, सध्या चांगलंच व्हायरल झालंय. आमदार रोहित पवार गेल्या ७ वर्षांपासून डिंबे–माणिकडोह बोगद्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.
कुकडी प्रकल्पाला चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि करमाळा या दुष्काळी तालुक्यांना पाण्याचे एक अतिरिक्त आवर्तन मिळणार होते. पण, स्वतःला सहकार महर्षी म्हणवणाऱ्या दिलीप वळसे पाटलांच्या दबावामुळे सरकारने या कामाला स्थगिती दिली, असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय.
रोहित पवारांनी थेट पुरावा दिलाय की, याच वळसे पाटलांनी २०१८ मध्ये स्वतः या बोगद्याला मान्यता दिली होती. मग आजच त्यांचा विरोध का? रोहित पवारांचे स्पष्ट म्हणणे आहे की, कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या काळात डिंभे धरणाची पाणी पातळी ७०९ मीटरवर कायम ठेवून बोगदा करण्याचा निर्णय झाला होता.
कोणाचेही १ थेंब पाणी कमी होणार नव्हते, तरीही वळसे पाटलांनी केवळ राजकारणासाठी स्थगिती आणली. वळसे पाटलांच्या या भूमिकेमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी संतापले आहेत.
रोहित पवारांनी सरकारला थेट इशारा दिलाय – ही राजकीय स्थगिती तात्काळ उठवा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या!





