
यंदा दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसतायेत. शेवगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्हा देखील दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या अशा परिस्थितीत आता शेवगाव तालुक्यातील गोळेगाव तलावाची भिंत उंचावली, तर ३५ ते ४० गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासोबत हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा आधार मिळू शकतो.
गर्भगिरीच्या डोंगररांगांमधून पावसाळ्यात वाहणारे असंख्य जलप्रवाह गोळेगाव तलावात जमा होतात. या भागाची भौगोलिक रचना पाहता तलावाची भिंत वाढवून मोठा जलसाठा निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भिंत उंचावून नियंत्रित दरवाजे बसवल्यास पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवता येईल. तसेच टंचाईच्या काळात नदीपात्रात पाणी सोडण्यासोबत भूजल पुनर्भरणालाही मदत होऊ शकते.
या मागणीला काशी-केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शासनस्तरीय पाठपुराव्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता शासनाने तांत्रिक सर्वेक्षण, व्यवहार्यता अहवाल आणि खर्चाचा अभ्यास करून या प्रस्तावाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





