
उद्या देशातील सर्वच छोटे-मोठे मेडिकल बंद राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण सर्व मेडिकल बंद राहण्याचे नेमकं कारण काय ? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया.
मंडळी, All India Organisation of Chemists and Druggists म्हणजेच AIOCD ने देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या संस्थेशी देशभरातील जवळपास 12 लाखांहून अधिक केमिस्ट आणि ड्रगिस्ट जोडलेले आहेत.
औषध विक्रेत्यांचा मुख्य विरोध ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या आणि घरपोच औषध सेवा देणाऱ्या ॲप्सविरोधात आहे. मोठ्या सवलती, AI वापरून तयार होणारी प्रिस्क्रिप्शन आणि नियमांशिवाय सुरू असलेली ई-फार्मसी यामुळे पारंपरिक मेडिकल दुकानदार नाराज आहेत.
AIOCD ने सरकारकडे GSR 817(E) आणि GSR 220(E) हे नियम मागे घेण्याची मागणी केली आहे. GSR 817(E) हा ई-फार्मसी नियंत्रणासाठी प्रस्तावित नियम आहे, तर GSR 220(E) कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी लागू करण्यात आला होता.
औषध विक्रेत्यांच्या मते, आता या नियमांचा गैरवापर होत असून स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे 20 मे रोजी देशभरात मेडिकल शॉप्स बंद राहण्याची शक्यता आहे.





