
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी शेतकरी आणि कामगार संघटनांकडून त्याला विरोध होत आहे. कमी पावसामुळे अनेक भागांतील ऊस अद्याप पुरेसा वाढलेला नाही. त्यामुळे उसात साखरेचे प्रमाण कमी राहून उतारा घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लवकर गाळप सुरू केल्यास शेतकरी आणि कारखानदार, दोघांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तब्बल १ लाख ३८ हजार ९३१ हेक्टर क्षेत्रावर ऊस असून, १२ सहकारी आणि ९ खासगी कारखाने आहेत. शेतकरी संघटनांनी गाळप लांबवून डिसेंबरमध्ये हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे.
अनिल औताडे यांनी प्रतिटन एक हजार रुपये, तर बाळासाहेब फटांगरे यांनी ५०० रुपये अनुदानाची मागणी केली आहे. रावसाहेब लवांडे यांनीही ऊस परिपक्व होईपर्यंत गाळप सुरू करू नये, अशी भूमिका घेतली आहे. आता परतीचा पाऊस काय दिलासा देतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





