
अहिल्यानगरमध्ये सध्या फुलांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत, गुलाब ३५० रुपये किलो, तर मोगरा तब्बल ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मंडळी, लग्नसराई आणि सण-उत्सवांचा हंगाम सुरू झालाय आणि त्याचबरोबर फुलांच्या किमतींनीही मोठी उसळी घेतली आहे.
उन्हाळ्यामुळे उत्पादन कमी झालं आहे आणि बाजारात आवकही मर्यादित आहे त्यामुळेच दर दुपटीने वाढल्याचं चित्र आहे.
सध्या बाजारात गुलाब ३०० ते ३५० रुपये किलो, मोगरा ५०० ते ६०० रुपये किलो, तर निशिगंधा ३०० ते ४०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. झेंडू आणि गलांड्याचे दरही वाढले आहेत.
याचा थेट परिणाम लग्नसोहळ्यांवर दिसत आहे. साधा हार जो पूर्वी ५०० रुपयांना मिळायचा, तोच आता ८०० ते १००० रुपयांपर्यंत गेला आहे. तर साउथ इंडियन स्टाईलचे डिझायनर हार ३ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत.
नगर जिल्ह्यातील विविध भागांतून फुलांची आवक होत असली, तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडतो आहे. त्यामुळे दर वाढतच आहेत. मंडळी, पुढील काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लग्नसराईत आता फुलांचं बजेटही वेगळं काढावं लागणार हे नक्की.





