
अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललं काय? महावितरणच्या एका उपकेंद्रात असा प्रकार समोर आलाय ज्यामुळे संपूर्ण सिस्टमवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मंडळी, या उपकेंद्रातील काही कर्मचारी चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश झुगारून मनमानी कारभार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
इतकंच नाही, तर हजेरी पत्रकावर थेट व्हाइटनर लावून स्वतःची उपस्थिती दाखवल्याची बाब समोर आली आहे. माहितीनुसार, दोन कर्मचारी सकाळी कर्तव्यावर हजर नव्हते. सहायक अभियंत्यांनी त्यांच्या नावासमोर ‘गैरहजर’ अशी नोंद केली. मात्र हेच कर्मचारी उशिरा कार्यालयात आले आणि त्यांनी बिनधास्तपणे व्हाइटनर लावून स्वतःची सही करून हजेरी लावली.
हा प्रकार फक्त कागदोपत्री गैरव्यवहार नाही, तर थेट शासनाची फसवणूक असल्याचं बोललं जात आहे. या बेशिस्तीचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वीज पुरवठ्याच्या तक्रारी वेळेवर सोडवल्या जात नाहीत, तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष होत आहे, आणि नवीन जोडणीसाठी लोकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
या कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी स्वतः सहायक अभियंत्यांनीच केल्याची माहिती समोर येत आहे. मंडळी, हा फक्त एका उपकेंद्राचा प्रश्न नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटत? कमेंट करा..





