
सहकार कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यावर अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे काही दिग्गजांनी सुरुवातीला स्वतःऐवजी पत्नींच्या नावाने ठराव करून घेतले होते.
मात्र, नंतर ही अट रद्द करण्याचा निर्णय झाला आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ठराव बदलण्याची संधीही मिळाली. याच संधीचा फायदा घेत आता माजी अध्यक्ष सीताराम गायकर, चंद्रशेखर घुले पाटील आणि अंबादास पिसाळ पुन्हा रेसमध्ये आल्याचं समोर आलं आहे.
अकोलेतील मोग्रस सोसायटीत भामाबाई गायकर यांच्या जागी सीताराम गायकर यांचा ठराव करण्यात आला. शेवगावच्या खानापूर सोसायटीत महेश थोरात यांचा ठराव रद्द करून चंद्रशेखर घुले पाटील यांचं नाव पुढे आलं.
तर कर्जतमध्ये सुनंदा पिसाळ यांचा ठराव बदलून अंबादास पिसाळ यांचं नाव करण्यात आलं. म्हणजेच सुरुवातीला ‘रिव्हर्स’ गिअर टाकणारे दिग्गज आता थेट ‘रेस’मध्ये उतरले आहेत!





