
आजपासून अहिल्यानगरवर पुन्हा पावसाची नजर राहणार आहे. ३८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसाने तब्बल ३८ दिवस दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर कडक उन्हाचा तडाखा वाढला आणि खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर पोहोचली. त्यातच विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळीही कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, आता हवामान विभागाच्या अंदाजाने आशेचा किरण दिसू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे शहरासह ग्रामीण भागात पावसाची शक्यता वाढली आहे. काही भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.
महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस मान्सूनचा शेवट नसून, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची पूर्वतयारी मानली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.





