
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे ! राज्यातील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने दडी मारली आहे.
जुलैमध्ये राज्यभर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्टपासून अनेक भागांकडे पाठ फिरवली. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान अहिल्यानगरमधील संगमनेर, शेवगाव आणि कर्जतसह ११ जिल्ह्यांमध्ये ३० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड नोंदवला गेला.
अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत तब्बल ३८ दिवसांचा पर्जन्यखंड नोंदला आहे. तर चार महसुली विभागांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही.
याचा थेट परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांना मोठा फटका बसू शकतो. पावसाची ओढ आणखी कायम राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. आता पुढील काही दिवसांत पाऊस बरसतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





