
अहिल्यानगर शहरातील वाढती वाहतूक आणि भविष्यातील शहरविकास लक्षात घेता मेट्रोची गरज असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी आतापासूनच नियोजन आणि पाठपुरावा केला, तर येत्या काही दशकांत अहिल्यानगरमध्ये मेट्रो धावू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराच्या विकासाबाबत बोलताना जगताप यांनी रस्ते विकासालाही प्राधान्य दिल्याचं सांगितलं. सिमेंटचे रस्ते तयार करताना त्यांची उंची वाढू नये, यासाठी जुने रस्ते खोदून नवीन रस्ते करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, उड्डाणपुलांमुळे शहरातील काही भागांतील रस्ते रुंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला असून बुरुडगाव रोडवर नवीन महापालिका रुग्णालय उभारलं जात आहे.
दरम्यान, तारकपूर ते सावेडी, पाइपलाइन रोड आणि तपोवन रोडकडील वाहतूक सुधारण्यासाठी रिक्षा संघटनेशी चर्चा करून सुविधा वाढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.





