
अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? महापालिकेच्या महासभेला नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याने मोठी खळबळ उडालीये. आणि यामुळे महापौरांवरही नामुष्कीची वेळ आली आहे. मंडळी, आज दुपारी एक वाजता महापालिकेची महासभा होणार होती. पण आश्चर्य म्हणजे या सभेला फक्त दोन-तीन नगरसेवक आणि काही अधिकारीच उपस्थित होते. आवश्यक संख्याबळच नसल्याने अखेर ही सभा तहकूब करण्याची वेळ महापौर ज्योती गाडे यांच्यावर आली.
या सभेच्या अजेंड्यावर अत्यंत महत्त्वाचे विषय होते. शहरातील घरपट्टी सर्वेक्षण, सावेडीतील विकासकामे, भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर, नाट्यगृह आणि बहुमजली पार्किंगसारखे मोठे निर्णय या सभेत होणार होते. पण तरीही नगरसेवकांनी चक्क या सभेकडे पाठ फिरवली.
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, नगरसेवक आलेच का नाहीत? यावरही वेगवेगळे दावे केले जात आहेत. सत्ताधारी नगरसेवक म्हणत आहेत की, आम्हाला सभा तहकूब झाल्याचा फोन आला होता, त्यामुळे आम्ही गेलो नाही. तर विरोधकांचा दावा आहे की, सभेला संख्याबळच नव्हतं, म्हणून आम्ही गेलो नाही.
इतकंच नाही, तर काही नगरसेवकांनी महापौरांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असा आरोपही केला आहे. मंडळी, हा फक्त राजकारणाचा मुद्दा नाही तर थेट शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्न आहे. या सर्व घडामोडींवर आपलं काय मत आहे?





