
नगर – मनमाड महामार्गावर दर काही दिवसांनी एक नवा अपघात होतोय अन यात आतापर्यंत अनेक निष्पाप व्यक्तींचा जीव गेलाय. यामुळे आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार ? हा प्रश्न उभा राहतोय.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात झालेल्या भीषण अपघातात बेलवंडी येथील मधुकर डोके यांचा कंटेनरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच राहुरी खुर्द येथे दोन दुचाकींच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा जीव गेला होता. स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गाचे रखडलेले काम, अर्धवट डांबरीकरण, दिशादर्शक फलकांचा अभाव, रात्रीची अपुरी प्रकाशयोजना आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
विशेषतः शनि अमावस्या, सुट्ट्या आणि धार्मिक यात्रांच्या काळात येथे मोठी वाहतूक होते, मात्र योग्य नियोजन दिसत नाही. अपघातानंतर प्रशासन केवळ पंचनामा आणि शोक व्यक्त करण्यात व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आता तरी महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही ‘मृत्यूंची मालिका’ थांबणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





