
निवडणुकीत मतं मागायला येतात… पण निवडून गेल्यानंतर खासदार गायब होतात. यामुळे आश्वी परिसरात सध्या लोकप्रतिनिधींविरोधात नाराजीचा सूर तीव्र होताना दिसत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदारांनी या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे “आमचे खासदार नक्की कोण?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
पुणे-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अर्धवट रस्तेमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असतानाही हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
दुसरीकडे आश्वी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्च वाढला आहे आणि विजेच्या लपंडावामुळे पिके सुकत आहेत. पाणी असूनही वीज नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या गंभीर प्रश्नांवर खासदारांनी आवाज उठवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संताप राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.





