
काय सांगता! एकाच गावातील शेतकरी मुलगा आणि शेतकरी मुलीचा विवाह झाला तर तब्बल ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मंडळी, आज अनेक तरुण-तरुणी शहरांकडे आकर्षित होत आहेत. ग्रामीण जीवन, शेती आणि गावातील संस्कृती यापासून नवीन पिढी दूर जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिव्हाळा फाउंडेशनने एक वेगळी आणि सकारात्मक पुढाकार घेतली आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिऊर येथे आयोजित कार्यक्रमात जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक संतोष पवार यांनी ही घोषणा केली. एकाच गावातील शेतकरी मुलगा आणि शेतकरी मुलगी यांचा विवाह झाल्यास फाउंडेशनच्या वतीने ५१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. संतोष पवार यांनी सांगितले की, शहरातील दिखावा आणि आभासी सुखाच्या मागे धावण्यापेक्षा समाधान, संस्कार आणि नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकरी कुटुंबे टिकली तरच ग्रामीण संस्कृती टिकेल आणि देशाची अन्नसुरक्षाही मजबूत राहील.
मंडळी, ग्रामीण संस्कृती, शेती आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम कितपत प्रभावी ठरतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. पण सध्या तरी या ५१ हजारांच्या बक्षिसाची घोषणा जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे.





