
अहिल्यानगरच्या उत्तर भागात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक कोसळलेल्या पावसामुळे जीवितहानीसह मोठं नुकसान झालं आहे.
मंडळी, कोपरगाव तालुक्यातील धामोरी आणि मायगावदेवी परिसराला या अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळात आणि पावसात मीराबाई थोरात या ६२ वर्षीय महिलांवर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच घटनेत काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायगावदेवी येथे वीज पडून म्हैस दगावली, तर धामोरीमध्ये वाऱ्यामुळे झाड कोसळून गायीचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, शेड आणि गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातही वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेचा आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. लोहारे येथे एका महिलेवर वीज कोसळली, तर डिग्रस येथे घराची भिंत कोसळून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
इतकंच नाही, तर रणखांब परिसरात वीज पडून पाच शेळ्या दगावल्याचीही घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंडळी, अवकाळी पावसामुळे केवळ शेतीच नाही, तर थेट जीवितहानी होत असल्याचं हे चित्र आहे.





