
पैठणमधील जायकवाडी धरण परिसरात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव येथील इमरान दगडू बागवान यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इमरान बागवान हे गंगापूरचे जावई होते. नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या इमरान यांनी तीन मित्रांसह जायकवाडी धरण परिसराला भेट दिली होती. सायंकाळी चारही मित्र नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले.
मात्र, धरणातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने नदीचा प्रवाह वेगाने वाढला आणि चौघेही पाण्यात अडकले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तिघांना सुखरूप बाहेर काढले. पण इमरान बागवान हे पाण्याच्या जोरदार प्रवाहात बेपत्ता झाले. तब्बल दीड तास शोधमोहीम राबवल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच मुकुंदवाडीतील दोन युवकांचा याच परिसरात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या चार दिवसांत जायकवाडी धरणाने तिसरा बळी घेतला आहे. म्हणून मंडळी नदी, धरण परिसरात पोहताना सतर्क राहा. एक छोटासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.





