
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे आणि आता पुढील काही दिवस अजूनच त्रासदायक ठरणार आहेत. पण याच दरम्यान मान्सूनबाबत एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे. मंडळी, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
तापमान मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवू लागला आहे. त्यामुळे काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आणि यामध्येच एक मोठी खुशखबर समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत असून, येत्या आठवड्याच्या अखेरीस मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच मान्सून हळूहळू पुढे सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. मंडळी, एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे मान्सूनची चाहूल त्यामुळे येणारे काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.





