
पावसाळा सुरू आहे… पण अहिल्यानगरमध्ये आजही पाण्यासाठी टँकर आणि खतासाठी रांगा लागल्या आहेत ! जुलैचे वीस दिवस उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
तब्बल १२० गावे आणि ५१६ वाड्या-वस्त्यांतील सुमारे अडीच लाख नागरिकांना ११५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ३४ टँकर सुरू असून अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दुसरीकडे, पारनेर तालुक्यात खरीप पिकांसाठी युरियाची मागणी वाढताच शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक कृषी केंद्रांवर कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि खतांच्या लिंकिंगचे आरोप होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथकांना तपासणीचे निर्देश दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, कृषी विभागाने पुरेसा युरिया उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.





