
अहिल्यानगरकरांनो, पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण २५ ते २९ जूनदरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे आणि खराब हवामानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
वादळी हवामानात झाडाखाली उभे राहणे, उंच खांब, टॉवर किंवा होर्डिंगजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते. विजांचा कडकडाट सुरू असताना शक्यतो घरातच सुरक्षित ठिकाणी राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा. शेतकरी बांधवांसाठीही हा इशारा महत्त्वाचा आहे.
शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवा, पाळीव जनावरांची योग्य व्यवस्था करा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करा. धरण, नदी किंवा कालव्यांच्या परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळा. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि गरज भासल्यास नजीकचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालय, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधा.





