Latest

शिक्षण व्यवस्थेचं विदारक वास्तव ! महिना उलटून गेला तरी शिक्षक नाही,विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचं वास्तव समोर आणणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेत शंभरहून अधिक विद्यार्थी आहेत, पण महिना उलटून गेला तरी शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मंडळी, ही घटना अकोले तालुक्यातील कोतूळ येथील जिल्हा परिषद शाळेची आहे. विशेष म्हणजे गावात दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतानाही या जिल्हा परिषद शाळेत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग आहेत. नियमानुसार मुख्याध्यापकांसह चार शिक्षक असणे अपेक्षित आहे. मात्र वास्तव वेगळंच आहे. एका शिक्षकाचे आजारपणामुळे निधन झाले, मुख्याध्यापक मे महिन्यात सेवानिवृत्त झाले, तर आणखी एक पद रिक्त आहे.

सध्या केवळ तीन शिक्षक नियुक्त आहेत. त्यापैकी एक शिक्षक इतर शासकीय कामात व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मिळत नाही. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पालक आणि ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही शिक्षण विभागाकडून अद्याप नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

आता प्रश्न एकच आहे,.. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आणि शिक्षण विभाग या शाळेला शिक्षक कधी देणार? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनानेच द्यायला हवीत. तुमचं मत काय? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button