
अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता मोबदला मिळाल्याशिवाय शिरूर बेल्हे महामार्गाचे काम पुढे करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. मंडळी, पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत.
मात्र या शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नव्हता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने सांगितले आहे की, बाधित जमिनींचे कायदेशीर भूसंपादन पूर्ण करावे आणि सहा महिन्यांत शेतकऱ्यांना मोबदला द्यावा.
मोबदला दिल्याशिवाय पुढील काम सुरू करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा महामार्ग शिरूर ते बेल्हे दरम्यानचा असून त्याच्या रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या हे काम जोरात सुरू होतं पण आता न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाला नियम पाळावे लागणार आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे १५ गावांतील शेतकरी प्रभावित झाले होते आणि अनेकांना अद्याप मोबदला मिळाला नव्हता. मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना निश्चित कालावधीत मोबदला मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





