
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने आपला ब्लॅकमणी व्हाईट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेचा वापर केल्याचा संशय आहे. खरातने समता पतसंस्थेतून 60 कोटींपेक्षा जास्त पैशाचा व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर या पतसंस्थेच्या राहाता येथील शाखेची शिर्डी पोलिसांनी व त्यानंतर ईडीने चौकशी केली.
आता याच राहाता शाखेतील खात्यांची सहकार विभागाकडूनही चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील खातेदारांची ई-केवायसी तपासणी जिल्हा उपनिबंधकाच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी दिले आहेत.
ही तपासणी करुन ही त्रिसदस्यीय समिती आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. खातेदारांनी खाते उघडताना भरलेले अर्ज, त्यावरील नाँमिनी, स्वाक्षऱ्या, मोबाईल लिकिंग, मोबाईल कुणाच्या नावावर आहेत त्याची माहिती हे सगळं तपासलं जाणार आहे. खरात नाँमिनी असलेल्या 100 पेक्षा जास्त खात्यांचीही संपूर्ण चौकशी पुन्हा केली जाणार आहे. या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.





