
राज्यातील लाखो शेतकरी ज्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीची वाट पाहत होते, ती अखेर जाहीर झाली आहे. पण या यादीने अनेक शेतकऱ्यांची निराशा केली आहे. कारण तब्बल ५६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात फक्त ५३३ शेतकऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला या पहिल्या यादीत स्थान मिळालेलं नाही.
मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात ही पहिली यादी जाहीर केली. या ५३३ शेतकऱ्यांना मिळून जवळपास २ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
मात्र एवढी कमी संख्या का? याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्याप प्राप्तिकर विभागाकडून मिळालेली नसल्यामुळे सध्या फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १८२, लातूरमध्ये १३३, पुण्यात ८५, अमरावतीत ५८, साताऱ्यात ३८, सोलापूरमध्ये २१ आणि नागपूरमध्ये १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता अहिल्यानगरसह उर्वरित जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष पुढील यादीकडे लागले आहे.





