
अहिल्यानगरमध्ये पार पडलेला एक विवाह सोहळा सध्या राज्यभर चर्चेत आला आहे.. कारण या लग्नाला मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मंडळी, प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा अतिशय भव्य आणि राजेशाही पद्धतीने पार पडला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह नवी मुंबईतील उद्योजक सुनील चिलप यांचे पुत्र साहिल यांच्याशी झाला. मात्र या लग्नाची खास चर्चा झाली ती उपस्थित मान्यवरांमुळे. या सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, तसेच अनेक खासदार, आमदार आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विवाहासाठी काही एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. नियोजन आणि व्यवस्थापन इतकं मोठं होतं की हा सोहळा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विवाह सोहळ्यांपैकी एक ठरला. याच ठिकाणी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह २०२६ च्या सोहळ्याचे ध्वजारोहणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या भव्य आयोजनामुळे हा विवाह सोहळा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आणि काही ठिकाणी ट्रोलही झाला.
मंडळी, हा सोहळा केवळ विवाह नव्हता, तर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे एक मोठा इव्हेंट ठरला हे नक्की..





