
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट आला आहे. दोन वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याच्या अटीमुळे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ आणि माधवराव कानवडे यांनी सुरुवातीला नातेवाईकांच्या नावाने ठराव केले होते.
मात्र, सहकार विभागाने विधी व न्याय विभागाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर या अटीबाबत महत्त्वाचा निर्णय झाला. दोन वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणुकीतून बाद करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या माजी संचालकांनी पुन्हा स्वतःच्या नावाने ठराव करून घेतले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला.
अंतिम मतदारयादीत ३ हजार ८३६ मतदारांचा समावेश आहे. आता महायुतीसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेतील नेत्यांमध्ये कोणाला संधी द्यायची, यावर राजकीय तडजोडी होणार आहेत.
दरम्यान, माधवराव लामखडे यांचा ठराव हरकत मान्य झाल्याने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ते निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.





