
कामाच्या ठिकाणीच एका 27 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने सुपा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं ? जाणून घ्या…
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या सुपा MIDC परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. तुषार राजेंद्र पाटील या 27 वर्षीय तरुणाने कंपनीच्या आवारात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
तुषार मूळचा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील रहिवासी असून तो सध्या सुपा येथे वास्तव्यास होता. तुषार एका खासगी कंपनीच्या मेंटेनन्स विभागात कार्यरत होता. 24 जून रोजी तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता.
मात्र दुपारच्या सुमारास कंपनीच्या परिसरातील जिन्याजवळ तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने कंपनी व्यवस्थापन आणि पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुपा MIDC परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





