
जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत केली नाही, तर आता मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. कारण राज्य शासनाने जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केलाय.
मंडळी, आता बाळाचा जन्म झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. या कालावधीत नोंदणी केल्यास प्रमाणपत्रही मोफत मिळणार आहे.
मात्र, ३० दिवसांच्या आत नोंदणी झाली नाही, तर ती विलंबित नोंदणी समजली जाईल. त्यानंतर एका वर्षाच्या आत नोंदणी करायची असल्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची पूर्वसंमती आणि मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इतकंच नाही, तर एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेल्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी, तसेच जुन्या दाखल्यांमधील नाव, पत्ता किंवा इतर चुका दुरुस्त करायच्या असतील, तरीही जिल्हा परिषदेकडून सखोल पडताळणी केल्यानंतरच मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे,जन्म किंवा मृत्यूची घटना घडताच तातडीने नोंदणी करा. अन्यथा अतिरिक्त कागदपत्रे, पडताळणी, मंजुरी आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात.
म्हणून मंडळी, ही माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण वेळेत केलेली नोंदणी तुम्हाला भविष्यातील मोठा त्रास वाचवू शकते.





