
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. नरसाळी येथील ४६ वर्षीय ज्योती भाऊराव माळी या मुलगा अक्षय आणि आठ वर्षांच्या नातीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या.
साई मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर तिघेही रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने ज्योती माळी या कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र मुलगा आणि लहान नात रस्त्याच्या कडेला पडल्याने त्यांचे प्राण वाचले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील वाढत्या बेफिकीर वाहनचालकांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.





