
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सतत कमी भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी मोठी आवक होऊनही गावरान कांद्याला प्रथम दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल १७०० ते १९०० रुपये, तर काही लॉटना २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला १४०० ते १६०० रुपये दर मिळाले.
दरम्यान, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या भावात वाढ दिसून आली आहे. येथे उच्च प्रतीच्या कांद्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सध्या मिळणारा भाव दिलासादायक असला तरी तो पुरेसा नाही. कारण अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा आहे. साठवणुकीदरम्यान कांदा खराब होतो, वजन घटते आणि त्याचा फटका उत्पादकांना बसतो. त्यामुळे किमान २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्यासच उत्पादन खर्च निघू शकतो, असे शेतकरी सांगत आहेत.
तरीही गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कांद्याच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण मानली जात आहे. आगामी काळात दरात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





