
कल्पना करा… ज्या पक्षाने कधीकाळी अहिल्यानगरच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवली होती, त्याच पक्षाला आज ९ तालुक्यांत एकही बुथ प्रतिनिधी उभा करता आलेला नाही!
अहिल्यानगर जिल्ह्यातील बुथ लेव्हल एजंट अर्थात बीएएलएफ नियुक्तीच्या आकडेवारीत मोठे राजकीय चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला तब्बल ९ तालुक्यांत एकही बुथ प्रतिनिधी नियुक्त करता आलेला नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचीही स्थिती समाधानकारक नसून पारनेर आणि श्रीगोंदा येथे एकही प्रतिनिधी नाही.
दुसरीकडे भाजप सर्वाधिक बुथ प्रतिनिधी नियुक्त करून जिल्ह्यात संघटनात्मकदृष्ट्या अव्वल ठरला आहे. त्यानंतर अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा क्रमांक लागतो. उद्धव ठाकरे गटालाही काही तालुक्यांत प्रतिनिधी उभे करता आलेले नाहीत.
ही आकडेवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, बुथ प्रतिनिधींची संख्या हा निवडणुकीतील अंतिम निकालाचा निश्चित मापदंड नसून, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा एक संकेत मानला जातो.





