
वीजबिलाची थकबाकी, नवीन जोडणीची अडचण आणि आर्थिक ताण यातून शेतकरी मुक्त होणार आहेत. कारण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता महावितरणकडील सुमारे ८४ हजार कोटी रुपयांची कृषी वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मिळणारी मोफत वीज योजना देखील कायम ठेवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली थकबाकी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच नवीन वीजजोडणी आणि इतर सेवांमधील अडथळेही कमी होण्यास मदत होणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातच ३ लाख ५९ हजार ४९१ शेतकरी या योजनेच्या कक्षेत येतात. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आणि शेतीसाठी वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





