
मंडळी, दुपारचे जेवण झाल्यानंतर अचानक डोळे जड होणे, कामात लक्ष न लागणे आणि झोप येणे… हे जवळपास प्रत्येकासोबत घडतं. अनेकांना वाटतं की दुपारी झोप घेणं म्हणजे आळशीपणा. पण तज्ज्ञ सांगतात की, योग्य वेळेत घेतलेली 15 ते 20 मिनिटांची झोप शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर असते.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांच्या मते, दुपारी शरीराची ऊर्जा नैसर्गिकरित्या कमी होते. विशेषतः दुपारी 2:30 च्या आसपास शरीराला थोड्या विश्रांतीची गरज जाणवते.
अशावेळी छोटीशी “Power Nap” घेतल्यास मेंदूला पुन्हा ऊर्जा मिळते. दुपारच्या छोट्या झोपेच्या फायद्यांविषयी बोलायचे झाले तर, मानसिक थकवा कमी होतो, एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो, कामाची उत्पादकता सुधारते आणि मूड फ्रेश राहतो.
पण दुपारची झोप 20 मिनिटांपेक्षा जास्त नसावी. जास्त वेळ झोपल्यास सुस्ती वाढू शकते आणि रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून पुढच्या वेळी दुपारी थकवा जाणवला, तर स्वतःला काही मिनिटांचा आराम नक्की द्या !





