
पुणे ते साईनगर शिर्डी रेल्वेने प्रवास करताय ना ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्याची मागणी आता जोर धरत आहे. पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या सध्याच्या वेळा प्रवाशांसाठी सोयीच्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
माजी रेल्वे सल्लागार श्रीचंद सचदेव यांनी रेल्वे प्रशासनाकडे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे. सध्या ही गाडी सकाळी पुण्यातून सुटून दुपारी शिर्डीत पोहोचते, तर शिर्डीतून संध्याकाळी निघून रात्री उशिरा पुण्यात येते. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांना या वेळांचा फारसा फायदा होत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सचदेव यांनी सुचवलेल्या प्रस्तावानुसार, गाडीची फेरी उलट करण्यात यावी. म्हणजेच रेल्वेने पहाटे साईनगर शिर्डीतून सुटून सकाळी पुण्यात पोहोचावे. त्यामुळे शिर्डी, कोपरगाव, राहुरी, अहिल्यानगर आणि श्रीगोंदा परिसरातील प्रवाशांना पुण्यातील कामांसाठी अधिक सोयीस्कर प्रवास करता येईल. आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेणार का, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.





