
अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकून राहावे यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सणांच्या काळात काही समाजकंटक सोशल मीडियावर खोट्या पोस्ट आणि जुने व्हिडिओ व्हायरल करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सायबर पोलिसांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विशेष लक्ष ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
यावेळी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचीही मागणी केली. भारत हा कृषीप्रधान देश असून गाईला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हिंदू समाजाच्या श्रद्धेचा पूर्ण आदर मुस्लिम समाज करतो, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, हा या मागणीमागचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.यावेळी साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक समद खान, मौलाना शफीक कासमी, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, अकबर अली शेख, नईम सरदार, संजू जहागीरदार, मोहसिन शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.





